आशिष चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेची पाकिस्तानवर मात, पाक कर्णधाराने पराभवाची सांगितली ‘ही’ कारणं

आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तानला नमवून श्रीलंकेने आशिया चषकावर आपले नाव कोरले. श्रीलंकेने दिलेल्या १७१ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव झाला. २० षटकांमध्ये पाकिस्तानला केवळ १४७ धावांपर्यंतच मजल मारता आली. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवाला नेमक्या कोणत्या चुका कारणीभूत ठरल्या याची चाचपणी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने केली आहे.

नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. “दुबईमध्ये क्रिकेट खेळणे हे नेहमीच आनंददायी असते. अंतिम सामन्यात आम्ही आमच्या क्षमतेनुसार फलंदाजी केली नाही. आम्ही सामन्याची सुरुवात चांगली केली, मात्र १५ ते २० अतिरिक्त धावा दिल्या. त्यानंतर सामना नीट संपवू शकलो नाही” अशी प्रतिक्रिया सामन्यानंतर बाबर आझमने दिली आहे.

या सामन्यात आमच्या चुकांचे प्रमाण कमी होते. मात्र, आमचे क्षेत्ररक्षण चांगले नव्हते. फलंदाजही निर्धारित लक्ष्य गाठू शकले नाहीत. मात्र, रिझवान, नईम आणि नवाझ हे चांगले खेळले. सामन्यांमध्ये चढ-उतार सुरुच असतात. जेवढ्या कमी चुका आम्ही करू, तेवढे आमच्या संघासाठी चांगले असेल, असे बाबर म्हणाला आहे. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात बाबर आझमही खास खेळी करू शकला नाही. सामन्यातील चौथ्या षटकात ५ धावांवर असताना प्रमोद मदुशनने बाबरचा बळी घेतला. भानुका राजपक्षे ४६ धावांवर असताना शादाबने त्याचा झेल सोडला होता. पुढे राजपक्षेने दमदार ७१ धावांची खेळी केली आणि श्रीलंकेने आशिया चषक जिंकला. पाकिस्तानला या एका चुकीची किंमत सामना गमावून चुकवावी लागली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *